निलंगा,दि.२७
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद व्यक्त करत निलंग्यात विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य ‘तिरंगा विजय मार्च’ काढण्यात आला. काँग्रेसचे निरीक्षक बाळासाहेब देशमुख व जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मार्चमधून लोकशाही, संविधान आणि विद्यार्थी एकजुटीचा संदेश देण्यात आला.
जिजाऊ चौकातून विजय मार्चला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज तिरंगा फडकत होता. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “विद्यार्थी एकजूट जिंदाबाद”, “संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर नागरिकांनीही टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी अभय साळुंके म्हणाले, “शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळते. विद्यार्थ्यांनी दाखविलेली एकजूट, संयम आणि लोकशाहीवरील विश्वास यामुळे हा विजय शक्य झाला आहे. हा केवळ विद्यार्थ्यांचा विजय नसून लोकशाही मूल्यांचा आणि संविधानावरील विश्वासाचा विजय आहे.”
मार्चदरम्यान विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मार्चची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला.
या तिरंगा विजय मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. तिरंग्याच्या रंगांनी नटलेला परिसर आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी डॉ. अरविंद भातांब्रे, प्रविण सूर्यवंशी, सुधाकर पाटील, अजित माने, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य शाहीद पटेल, योगिता जाधव, गटनेते अजित नाईकवाडे, नगरसेवक डॉ. गजेंद्र तरंगे, सिराज देशमुख, इस्माईल मनियार, प्रशांत वांजरवाडे, गणेश पेठकर, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, अभिजित उसनाळे, श्रीमंत जाधव, महेश देशमुख, विठ्ठल पाटील, आंबादास जाधव, उमाकांत जाधव, हाजी सराफ, चक्रधर शेळके, विलास कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.